उपराष्ट्रपतींच्या भूमिकेमुळे वाढणार हैराण पाकिस्तानचे टेन्शन
विशाखापट्टणम: आता पाकिस्तानशी केवळ भारताकडे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) सोपवण्याबाबतची चर्चा बाकी आहे, अशी परखड भूमिका उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी बुधवारी मांडली. त्यामुळे भारताच्या धडक पाऊलांमुळे आधीच हैराण झालेल्या पाकिस्तानचे टेन्शन आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
येथे एका कार्यक्रमात बोलताना नायडू यांनी काश्मीर मुद्द्यावरून आदळआपट करणाऱ्या पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यावर बोलण्यासारखे काय आहे? अर्थात, एका बाबीवर चर्चा करण्याचे अजून राहिले आहे. ती बाब म्हणजे काश्मीरचा उर्वरित भाग (पीओके) आमच्याकडे सोपवणे, असे त्यांनी ठणकावले. भारत हा शांतताप्रेमी देश आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या देशावर हल्ला करणार नाही. मात्र, आमच्यावर कुणी हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानकडून सातत्याने विविध प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्या धमक्यांचा समाचार नायडू यांनी घेतला. पुढे बोलताना ते म्हणाले, आमचा एक शेजारी (पाकिस्तान) सातत्याने दहशतवादाला पाठिंबा देत आहे. त्यातून स्वत:लाच हानी पोहचू शकते याची जाणीव त्या शेजाऱ्याला नाही.