कराचीवरील तीन हवाई मार्ग 1 सप्टेंबरपर्यंत बंद
इस्लामाबाद: पाकिस्तानने भारतासाठी कराची शहरावरून जाणारे तीन हवाई मार्ग 28 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद केले आहेत. आता भारतासाठी संपूर्ण हवाई हद्दच बंद करून टाकण्याचाही विचार केला जात असल्याचे पाकिस्तानच्या हवाई वाहतुक प्राधिकरणाने म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी कराची शहरावरील तीन हवाई मार्गांचा वापरही बंद होणार आहे. त्यामुळे वैमानिकांना कराचीवरील मार्ग टाळून अन्य मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. चार दिवसांच्या हवाई वाहतुकीची बंदी 1 सप्टेंबरला संपणार आहे, असे पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतुक प्राधिकरणाने म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान खान हे भारतीय विमानांसाठी पाक हवाई हद्दीच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद खान मंगळवारी म्हणाले होते. भारताला हवाई हद्दीचा आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी जमिनीवरील मार्गाचा अजिबात वापर करू देऊ नये, या प्रस्तावावर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळामध्ये मंगळवारी चर्चादेखील झाली होती.
फेब्रुवारी महिन्यात भारताने केलेल्या “एअर स्ट्राईक’नंतर पाकिस्तानने संपूर्ण हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. मात्र 27 मार्च रोजी नवी दिल्ली, बॅंकॉक आणि कुआलांपूरची विमाने वगळता अन्य विमानांसाठी ही हवाई हद्द खुली करण्यात आली होती. पाकिस्तानने 15 मे रोजी हवाई हद्दीवरील बंदीला 30 मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर 16 जुलै रोजी संपूर्ण हवाई हद्द भारतासाठी खुली करण्यात आली होती.