नानगोपोक काकचिंग (मणिपूर) – मणिपूरमधील एका छोट्याशा गावाला टोकियो ऑलिम्पिकनंतर एकदम झळाळी प्राप्त झाली. कारण या गावची कन्या साईकोम मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर या गावाला वलय प्राप्त झाले.
विधानसभेची निवडणूक होत असताना नानगोपोक काकचिंग या गावाची आता पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे. कारण मिराबाई चानूच्या या गावात विकासाच्या नावाने अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. या गावात अद्यापही पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही. कॉंग्रेस, भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वाहनांचे ताफे या गावात येतात. मात्र त्यांच्या वाहनांनाही खाचखळग्यांच्या आणि खड्ड्यांच्या रस्त्यांने यायला लागते.
गावात अजून पाईप लाईन आलेली नाही. पिण्याचे पाणी विकत घेण्यासाठी टॅंकर ऑपरेटरला दर महिन्याला 1 हजार रुपये द्यावे लागतात, असे मिराबाईच्या आई साईखोम टोम्बी यांनी सांगितले. घरातील सर्वांना जवळच्या तलावातून पाणी आणावे लागते.
सत्ता कोणाचीही येवो मात्र मणिपूरची राजधानी इंफाळपासून केवळ 25 किमी अंतरावरील या गावातील स्थानिकांच्या नशिबी दुर्लक्षच येते. या विधानसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने हा इतिहास पुन्हा एकदा उजळणी होते आहे. मात्र मिराबाई चानूच्या सत्काराच्या निमित्ताने गावात आलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी गावाच्या विकासाच्या गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे आता हे दुष्टचक्र आता थांबणार अशी आशा आहे. गावात येणाऱ्या राजकारण्यांनी 1.2 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहेत. मात्र हे आश्वासन अजून तरी केवळ आश्वासनच राहिले आहे. कारण या प्रकल्पाचे केवळ 15 टक्के काम 2 वर्षात झाले आहे.
वैद्यकीय आपत्कालिन स्थितीच्यावेळी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नसणे ही आणखीन एक मोठी अडचण आहे. कारण या गावात एकही प्राथमिक आरोग्य केंद्रही उपलब्ध नाही.
या गावात 85 घरे आहेत आणि 300 मतदार आहेत. लालमाय विधानसभा मतदारसंघातील या गावात भाजप, कॉंग्रेस, रिपाई (आठवले), संयुक्त जनता दल आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.