प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -महापालिकेत विविध खात्यांतील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. आस्थापनेवरील गट-2 व गट-3 मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी सात ते आठ लाख उमेदवार येतील, त्यामुळे गोंधळाची स्थिती उद्भवू शकते, असा कयास बांधत महापालिकेने केंद्र शासनाची भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेची नेमणूक केली आहे. तथापि, महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण आतापर्यंत महापालिकेकडे फक्त 26 हजार 420 अर्ज दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या 40 ते 50 हजारांपर्यंतच जाईल, असा अंदाज आहे.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखो अर्ज दाखल होतील, अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 32 हजार उमेदवारांचीच नोंदणी झाली आहे, तर त्यापैकी 26 हजार 420 उमेदवारांचे शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत अजून अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.
अपेक्षा 8 लाख उमेदवारांची
जवळपास सहा वर्षांनी ही भरती होत असल्याने तब्बल सात ते आठ लाख उमेदवार येतील, अशी महापालिकेस अपेक्षा होती. मात्र, आलेले अर्ज पाहता महापालिकेची अपेक्षा फोल ठरली आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे 8 दिवस शिल्लक असतानाच केवळ 32 हजार जणांचीच नोंदणी केली आहे.
लालांपासून सावध राहा…
भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही व्यक्ती अथवा स्थानिक संस्थेची अथवा मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे अपरिचित व्यक्ती दलाल किंवा इतर कोणीही भरती करून देतो, असे सांगून आर्थिक देवाण-घेवाण करत असल्यास त्यास फसू नये, आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच असे काही निदर्शनास आल्यास महापालिकेस कळवावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.