आळंदी – शहरातील वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने जड वाहतुकीस सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत बंदी घातली आहे. तसेच शहरात 20 ठिकाणी गतिरोधकही बसविण्यात येणार आहेत. एकाच आठवड्यात जड वाहनांच्या धकडेत दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता, यापुढे अपघात घडू नये यासाठी आता प्रशासन सतर्क झाले आहे.
आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी आहे. लग्न कार्यासाठीही येथे अनेक लोक येतात. तसेच आळंदी परिसरात अनेक कंपन्या असल्याने शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदीत सिमेंटचे प्रशस्त रस्ते करण्यात आले; मात्र त्यावर अद्याप गतिरोधक बसविण्यात आले नाहीत.
आळंदीतील नागरिक तसेच लोकप्रतिनिधीनी अपघाताचा धोका टाळण्यासाठी मुख्य वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात दोन अपघातांच्या घटना घडल्या. यात एका 19 वर्षीय मुलाचा आणि 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पोलीस प्रशासनाचा सत्कार
आळंदीतून होणारी दिवसा अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीस यश आले असून त्यावर कार्यवाही दिघी-आळंदी वाहतूक पोलीस शाखेने सुरु केल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाचा सत्कार आळंदी ग्रामस्थांचे तर्फे करण्यात आला.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शहरातील रस्ते बांधणी झाली आहे. काही ठिकाणी पदपथ आणि गतिरोधक बसविण्याचे काम बाकी होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गतिरोधक बसविणे हे अतिमहत्वाचे असल्याने तातडीने गतिरोधक बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाकडून आलेल्या यादीनुसार शहरातील मुख्य वर्दळीच्या 18 ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येणार आहेत. येत्या तीन दिवसांत गतिरोधक बसतील.
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी