मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवारांच्या बंडाळीनंतर अवघ्या महाराष्ट्रात रान पेटले आहे. त्यातच अजित पवार व जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. पण आता स्वतः जयंत पाटलांनी आपले अजित पवारांसोबत कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पाटील म्हणाले की, शरद पवारांना सोडून जाणारे आजही त्यांना मानतात. ते आग्रहाने पवार साहेब आमचे विठ्ठल असल्याचे सांगतात. त्यांचा फोटो लावतात. त्यावर मी आक्षेप घेणे योग्य नाही. अजित पवार व माझ्यात कोणताही वाद नाही. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. तसेच, कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मविआच्या सभांना लवकरच सुरुवात
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवकाश आहे. सध्या पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. जनतेचा या राजकारणाला विरोध आहे. शरद पवार हीच गोष्ट जनतेपुढे जावून सांगत आहेत. हसन मुश्रीफ यांनाही शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. त्यांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. पवारांच्या कोल्हापूरच्या सभेत याची उत्तरे मिळतील.
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभाही लवकरच सुरू होतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, शरद पवारांनी पुरोगामी विचारसरणीशी केव्हाही तडतोड केली नाही. शाहू, फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रात जपणे अत्यावश्यक आहे. जनतेला समतेचा संदेश देण्याची गरज आहे. काहीजण शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याची अफवा पसरवत आहेत, असेही जयंत पाटील यावेळी पुढे बोलताना म्हणाले.
मलिकांना अडचणीत टाकणार नाही
जयंत पाटील यांनी यावेळी तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या नवाब मलिकांवर राजकीय भाष्य करून त्यांना अडचणीत टाकणार नसल्याचेही स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आलेत. आम्ही काही जणांनी त्यांची भेट घेतली. त्यांना किडनीचा त्रास आहे.
न्यायालयाने त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. ते सध्या राजकारणावर कुणाशीही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याविषयी राजकीय बोलून त्यांना अडचणीत टाकणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.