जम्मू, -जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी मांडली.
काश्मीरमध्ये शुक्रवारी दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले.
त्या घटनेचा संदर्भ घेऊन अब्दुल्ला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला. पोलिसांना प्राण गमवावा लागण्याची घटना दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे सरकार भासवते. खरोखरीच तशी स्थिती आहे का? पोलिसच सुरक्षित नसतील; तर सामान्य जनता कशी सुरक्षित असेल, असा सवाल त्यांनी केला.
दहशतवादी कारवाया पाहता अजूनही पाकिस्तानशी चर्चा व्हावी असे वाटते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अब्दुल्ला उत्तरले, चर्चा करावीच लागेल.
दहशतवाद संपवायचा असेल तर दुसरा पर्याय नाही. आपली भूमी बळकावणाऱ्या चीनशी चर्चा होते. तुम्ही त्याबद्दल काय बोलणार, असा प्रतिसवाल त्यांनी केला. चीन काय करत आहे ते समजण्यासाठी संसदेत चर्चेला परवानगी द्या, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.