नवी दिल्ली – केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सूड भावनेने केला जात असून केवळ राजकारणातील व्यक्तींनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, या पध्दतीने राज्यातील आघाडी सरलार पाडू इच्छिणाऱ्यांनी लक्षात ठेवावे हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
सुळे यांनी ईडी आणि सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांविषयी सवाल उपस्थित केला. अनिल देशमुखांच्या घरावर एका वर्षात 7 वेळा छापा टाकला गेला. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. तुम्ही एकाच कुटुंबावर 7 वेळा छापा टाकला. मग पहिल्या सहा वेळा काय चुकले? तपास यंत्रणा आता संबंधित व्यक्तीच नाही, तर त्यांच्या कुटुंबाला देखील टार्गेट करत आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या व्हायरल झालेल्या विधानाचा उल्लेख केला. हर्षवर्धन पाटील म्हणतात, आमच्याकडे ईडी-सीबीआय येऊ शकत नाही कारण आम्ही भाजपामध्ये आहोत. हे धक्कादायक आहे. ईडी आणि सीबीआय फक्त अशा राज्यांच्या विरोधात वापरल्या जात आहेत का जे राज्य तुमच्या विरोधात लढत आहे? मी लहानाची मोठी झाले, तेव्हा मला माहितीही नव्हतं की ईडी-सीबीआय काय असते? आजकाल तर रोज यांची चर्चा होते. कुणाच्या घरात घुसतात, कुणाच्या बायका-मुलांना घेऊन जातात. देशात ही एक नवी संस्कृती आली आहे, असे त्या म्हणाल्या.
एकनाथ खडसेंच्या कुटुंबाला देखील असेच केले गेले. त्यांच्या मुलीला, त्यांच्या पत्नीला का चौकशीसाठी बोलावण्यात आले? त्यांच्या पत्नी वयोवृद्ध आहेत. ईडी आणि सीबीआय नेमकं काय करत आहे? महिलांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला राजकीय हल्ला करायचा असेल, तर समोरून करा, कुटुंबियांच्या मागे का पडला आहात? राजकीय हेतूसाठी कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे, हे खरंच लाजिरवाणे आहे, असे त्या म्हणाल्या.
आघाडी सरकार 25 वर्ष पूर्ण करेल
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष पूर्ण करेल, असा ठाम विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला. महाविकासआघाडी लढा देत आहे. तुम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही काही महिने देखील पूर्ण करू. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष पूर्ण केली आहेत. 5 वर्ष पूर्ण करू आणि 25 वर्ष देखील पूर्ण करू आणि तुम्हाला दाखवून देऊ की महाराष्ट्रा देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक असेल जिथे चांगलं प्रशासन असेल आणि भ्रष्टाचार नसेल, असे त्या म्हणाल्या.