सुनीता शिंदे
कराड – समाजात आजही अनाथ, परितक्त्या, विधवा महिलांना मानाचे स्थान मिळत नाहीत. कोणत्याही शुभ उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांच्यावर ओढावलेल्या या संकटामध्ये त्यांचा काहीच दोष नसतो. हे माहित असतानाही त्यांना अनेक गोष्टींपासून लांब ठेवले जाते. प्रत्येक गावात अशा महिलांची संख्या मोठी आहे.
त्यांचे संघटन करून त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ज्ञानदीप, राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. गत सात महिन्यांपूर्वी कापिल येथे सुमारे 45 एकल महिलांचे संघटन करण्यास या संस्थेस यश आले असून ही चळवळ आता कापिललगत असणाऱ्या गोळेश्वर गावातही सुरू झाली असून प्रत्येक गावात असे संघटन उभे करण्याचा संस्थेचा मानस आहे.
पतीच्या निधनानंतर अनेक महिला एकाकी पडतात. आजही आपल्या भागात वैधव्य आलेल्या महिला घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडत नाही. याशिवाय परितक्या, घटस्फोटीत, व्यंग असणाऱ्या महिला तसेच काही कारणास्तव विवाह न झालेल्या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही. त्यामुळे या महिलांमध्ये एकाकी वृत्ती निर्माण होते.
समाजापासून अलिप्त राहणेच त्या पसंत करतात. त्यामुळे त्यांच्यावरील असणारे संकट आणखीनच वाढत जाते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील लोकही मदत करत नाहीत. त्यामुळे कुटुंबापासून लांब राहणाऱ्या महिलाही अनेक आहेत. या महिलांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यात असणाऱ्या सामर्थ्याची जाणीव त्यांना व्हावी, उपजिवीका मिळावी, त्यांच्या हक्काची जाणीव होणे गरजेचे असल्याचे ज्ञानदीप संस्थेच्या संचालिका मधुराणी थोरात यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी सन 2018 मध्ये एकल महिला या विषयावर फोकस केला. त्यासाठी कराड शहरापासून जवळच असणाऱ्या कापिल, गोळेश्वर, गोटे, मुंढे, नांदलापूर, जखिणवाडी या गावांची निवड केली. त्या गावांमध्ये जाऊन तेथील महिलांचे सर्व्हेक्षण केले. ज्ञानदीप संस्थेच्या या उपक्रमाला मुंबईस्थित कोरो या संघटेनेने पाठबळ दिले.
कोरो इंडियाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमातून मिळणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा यातून एकल महिला प्रश्नावर काम करणारे राज्यव्यापी संघटन उभा करण्याचा प्रयत्न कोरो गेली 4 ते 5 वर्ष ज्ञानदीपसारख्या अनेक संस्था ज्या हक्काधारीत दृष्टिकोनातून सामाजिक बदलासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थासोबत करत आहेत. कोरो या संस्थेने ज्ञानदीप मधील काही कार्यकर्त्या महिलांची परीक्षा घेतली. त्यात ज्ञानदीप संस्था यशस्वी झाली. त्यातून गावस्तरीय नेतृत्व उपक्रमासाठी कापिल येथील धनगर समाजातील सुनीता डाईंगडे यांची निवड करण्यात आली.
झोपडीवजा घरात राहणाऱ्या सुनीता डाईंगडे या सध्या कापिलमधील महिलांच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. त्यांनी संस्थेच्या मधुराणी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 45 एकल महिलांचे संघटन केले. अनेकवेळा या महिलांच्या घरी भेटी घेऊन त्यांना बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केले. आज या महिला संघटनेच्या बैठकांमध्ये बोलू लागल्या आहेत. स्वत:चे मत मांडू लागल्या आहेत. एवढेच नव्हेतर या महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्यातील पहिलाच एकल महिला बचतगट सुरु करण्यात आला आहे.
या बचतगटाला पंचायत समितीच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच सुनीता डाईंगडे हिच्यामध्ये असणाऱ्या नेतृत्वगुणाची पारख करुन कोरो या संस्थेने तिला अठरा महिन्यांची फेलोशिपही प्रदान केली आहे. ज्ञानदीप संस्थेच्या गाव भेट उपक्रमामुळे गावातील एकल महिलांना अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले आहे.
कमी शिक्षण असणाऱ्या महिलाही आता अनेक पुस्तकांचे वाचन करुन विविध माहिती मिळवत आहेत. इतर महिलांप्रमाणे आपणही सक्षम व्हावे, अशी या महिलांची मानसिक तयारी आता बनू लागली आहे. या संघटनमुळे कापिल मधील महिलांना अनेक शुभ कार्यात सामावून घेण्यासाठी लोकही आता प्रयत्न करत आहेत. ज्ञानदीप संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमाची चळवळ आता दिशादर्शक ठरत आहे.
समाजात आज अनेक महिला एकट्या पडलेल्या दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्यांना कुटूंब व समाज यांचे नसलेले पाठबळ. त्यामुळे या महिला नैराश्याचे जीवन जगत आहेत. काहींनी तर आत्महत्त्येचा मार्ग स्विकारल्याचे दिसते. परंतु काहीही दोष नसताना या महिला अशाप्रकारचे जीवन जगताना होत्या. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देऊन समाजात मानाचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून आम्ही लढा सुरु केला आहे. तो कायमस्वरुपी सुरु राहील.
सौ. मधुराणी थोरात, संचालिका, ज्ञानदीप, राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक संस्था