पुणे – यंदा जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे जेमतेम भरली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुध्दा पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातूनही पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्यावरून ग्रामीण व शहरी, असा वाद निर्माण होत आहे.
पुढील वर्ष तर निवडणुकांचे आहे. त्यामुळे पाण्यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. अशातच कमी पाणीसाठा त्यामुळे शेतीला पाणी आणि शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. “नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पाण्यावरून राजकारण रंगते. यंदा मात्र, दुष्काळाची परिस्थिती असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन आतापासूनच केले तर पाणीटंचाईची तीव्रता कमी भासू शकते. शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे.
खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते. शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे.
मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशीरा होत असल्याचे दिसून येते. जून महिन्यापर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात अपेक्षित, असा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जुलै महिन्यातही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते. अशी सर्व परिस्थिती असताना पाणी नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
राजकारण रंगले तर आश्चर्य वाटायला नको
यंदा ग्रामीण भागातही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी होत आहे. काही धरणांमधून शेतीची आर्वतने सुरू झाली आहे. मात्र, पुढील आवर्तन देताना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत पाणी वाटपाचे अधिकार हे पालकमंत्र्यांना आहेत. त्यामुळे राजकीय गणिते, आगामी निवडणुका, पाणीटंचाईची स्थिती अशी सर्व परिस्थिती पाहता पाण्याचे वाटप करताना राजकीय नेत्यांची आणि प्रशासनाची कसोटी लागणार आहे. पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी, तसेच आम्हीच पाणी दिले, याचा तोरा मिरविण्यासाठी पाण्यावरून राजकारण रंगले तर आश्चर्य वाटायला नको!