- तूर्तास स्थानिकांना फायदा नाही, देहूरोडकरांची वाट बिकटच, नियोजन नसल्याने सावळागोंधळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारणयात आला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र, इन-आउटचे कोणतेही नियोजन केलेले नाही. आकुर्डीपासून सेवा रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना पुलावर जाण्यासाठी सोय (इन) केली नाही. त्यामुळे देहूरोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा उपयोग होत नाही. यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीच्या भक्ती शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीचे वर्षांपासून सुरु आहे. उड्डाणपूल, रोटरी मार्ग बनविण्यात येत आहे. या कामामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारुन ये-जा करावी लागत होती. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
त्यामुळे भक्ती-शक्ती पुलावरील पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने येण्याचा मार्ग वाहतुकीस खुला करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, इन-आउटचे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे सेवा रस्त्याने आकुर्डीतून देहूरोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा काहीच उपयोग होत नाही.
आकुर्डीतून सेवा रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकाला भक्ती-शक्ती पुलावर जाण्यासाठी नसल्याने वाहनचालकाला पुलाचा उपयोग होत नाही. पूल खुला होऊनही अडीच किलोमीटरचा वळसा मारून चालकांना जावे लागते. ग्रेडसेपरटरमधून आकुर्डीच्या पुढे तुळजाभवानी मंदिर, पवळे पुलाच्या सुरुवातीला आणि पुलाच्या शेवटी तीन ठिकाणी आउटची सोय आहे. पण, आकुर्डीपासून एकाही ठिकाणी इनची सोय नाही. त्यामुळे देहूरोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा उपयोग होत नाही.
अडीच किलोमीटरचा वळसा मारावा लागतो
स्थानिक वाहनचालक प्रताप शिंदे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाने उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला आहे. मात्र त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नाही. आकुर्डी आणि निगडी भागातील नागरिकांना आजही अडीच किलोमीटरचा वळसा मारूनच जावे लागते. आकुर्डी चौकापासून पूलावर जाण्यासाठी कुठेही सोय करण्यात आली नाही. प्रशासनाने याचे नियोजन करूनच उड्डाणपूल सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अद्याप वाहतूक कोंडी व लांब पल्ल्याचा वळसा या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सद्यस्थितीत पुणे – मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल सुरू केला आहे. अपघात टाळण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याकडे येण्याचा मार्ग सुरू केला आहे. अद्याप रोटरी मार्गाचे काम सुरू आहे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याचे नियोजन करण्यात येईल. तोपर्यंत येथील स्थानिक नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.
– विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस