काठापूर, पोंदेवाडीतील बळीराजा हताश : वालवड, तरकारी पिके भुईसपाट
लाखणगाव – काठापूर आणि पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले; परंतु अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत तरी पीक पंचनामे त्वरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी केली आहे.
काठापूर येथे दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. शेतकरी एकनाथ करंडे यांच्या शेतातील वालवडीची बाग पडली आहे. त्याचप्रमाणे उगवून आलेली कोथिंबिरीचे पीकही खराब झाले असून काढणीला आलेली कोथिंबीरही आता पावसामुळे काळे डाग पडून सडणार आहे.
अनेक शेतकऱ्यांची तरकारी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पालेभाज्या, बीट, वालवड यासारखी पिके पावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होईल म्हणून कांद्याची बियाणे लवकर टाकले होते.
ही कांद्याची रोपे सुद्धा खराब झाली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे शेतात टाकले ते वाहून गेले आहे. त्यामुळेच एकंदरीत शेती पिकांचे त्याच्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.