आपचे टीकास्त्र: एनआरसीच्या नावाखाली भाजपकडून अराजकाचा फैलाव
लखनौ: राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाच्या (एनआरसी) नावाखाली सत्तारूढ भाजप अराजक फैलावत आहे, असे टीकास्त्र आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी सोडले. एनआरसीची अंमलबजावणी उत्तरप्रदेशात झाली; तर त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तराखंडला जावे लागेल, अशी खिल्लीही आपने उडवली.
गरज भासल्यास उत्तरप्रदेशात एनआरसीची अंमलबजावणी केली जाईल, असे वक्तव्य अलीकडेच योगींनी केले. त्यावरून योगी मूळचे उत्तराखंडचे असल्याकडे लक्ष वेधत आपचे खासदार संजय सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना उपरोधिक प्रतिक्रिया दिली. यावेळी सिंह यांनी एनआरसीवरून भाजपवर टीकेची झोड उठवली. आसाममधील एनआरसीत अनेक त्रुटी आहेत. तशाने देश पुढे जाऊ शकत नाही. हिंदूहिताविषयी भाजप बोलत असतो. मात्र, आसाममध्ये 18 लाख हिंदूंना निर्वासित ठरवण्यात आले आहे. त्यातील बहुतांश उत्तरप्रदेश आणि बिहारचे रहिवासी आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्यांना आणि कारगिल युद्धात लढलेल्यांनाही अचानकपणे निर्वासित ठरवण्यात आले आहे. भाजपला केवळ अस्थिरता निर्माण करायची आहे आणि द्वेष पसरवायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.