Gopichand Padalkar : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि छगन भूजबळ यांच्यात देखील शाब्दिक वाद सुरू झाले आहे. यातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पल भिरकावण्यात आली. या घटनेनंतर जालन्यात धनगर समाजाकडून रस्त्यावर टायर जाळत या चप्पलफेकीचा निषेध करण्यात आला. या प्रकरणावर गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला आहे. या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते.”
पुढे ते म्हणाले, “मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे.”
“गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात. तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणं नसून समाजात अशांतता पसरवणं आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे? हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे,” असेही पडळकर यांनी सांगितले.
या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये – पडळकर
जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी कारण आपल्याला डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या 11 तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करण्याचे आवाहन पडळकरांनी केले.