नवी दिल्ली : मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. यासाठी काँग्रेसवर टीका होताना दिसते. या पराभवासाठी काँग्रेस नेतृत्त्वाला जबाबदार धरण्यात येत होते.पक्षातील ज्येष्ठ नेतेदेखील नाराज असल्याचे बोलले गेले. या सर्वात आता दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरलं आहे. तसंच २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे. मुखर्जी यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिलं असून रूपा प्रकाशन द्वारे ते जानेवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकातील काही भाग सध्या समोर आला आहे.
प्रणव मुखर्जी यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले होते. पुस्तकातील काँग्रेस संबंधातील त्यांनी केलेली टीका अशावेळी समोर आली आहे जेव्हा काँग्रेसमधीलच काही अंतर्गत वाद समोर येत आहे. “माझ्या पक्षातील काही सदस्यांचे असे मत होते की २००४ मध्ये जर पंतप्रधान असतो तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही. मी राष्ट्रपती पदी विराजमान झाल्यानंतर पक्ष नेतृत्वानं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणं हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांची संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे खासदासांशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला,” असा दावा प्रणव मुखर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर त्यांना विरोध करणारा पक्षातील एक गट देखील तेवढंच सक्रिय होता. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सर्व परिस्थितीत प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातील दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.