मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर शिवसेनेव्यतिरिक्त सरकार स्थापन केले तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अहंकारी शिवसेनेनेचे तुकडे पडतील, असे महाराष्ट्रातील भाजपला पाठिंबा दर्शविणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. आगामी सरकार स्थापनेबाबत शिवसेनेचे जवळपास 25 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, असा दावा राणा यांनी सोमवारी केला. सेनेत 56 आमदार आहेत.
राणा आणि अमरावतीमधील अपक्ष लोकसभा सदस्य असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज भेट घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रवि राणा म्हणाले की, शिवसेना गेल्या पाच वर्षात खूपच गर्विष्ठ झाली आहे. फडणवीसांनी यावर नियंत्रण ठेवायला हवे.
“खरं तर, शिवसेनेचे 25 आमदार सरकार स्थापनेसाठी माझ्या संपर्कात आहेत. जर फडणवीस यांनी शिवसेनेविना सरकार स्थापन केले तर येत्या दोन महिन्यांत सेनेत फूट पडेल आणि सुमारे 25 आमदार भाजपमध्ये दाखल होतील.’ असा दावा त्यांनी केला.
सत्तेचे समान वितरण आणि मुख्यमंत्रिपदाची वाटणी करण्याच्या मागणीसाठी आघाडीवर असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्यावरही राणा यांनी टीका केली. राऊत म्हणजे “पक्षाचा पोपट’आहे. त्यांना लगाम घालण्याची गरज आहे. संज्य राऊत काहीही म्हणो, पण राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाला आहे. हा जनादेश कोणत्याही एका पक्षाला अनुकूल नसल्याचे उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे, असे राणा म्हणाले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस राणा यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.