जयंत माईणकर
संजय राऊत शिवसेनेच्या मुखपत्रातून आमच्याविरुद्ध इतकं लिहितात की केवळ यांच्या लिखाणामुळे आमची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती तुटेल! असे भाजपचे अनेक “वजनदार’ नेते खासगीत पत्रकारांना सांगायचे…
शिवसेना मुखपत्राचे संपादक पद मालक- संपादक या पद्धतीनुसार प्रथम बाळासाहेबांनी नंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे ठेवलं. मात्र कार्यकारी संपादकपदी प्रथम स्व. अशोक पडबिद्री आणि 1992 पासून संजय राऊत यांची नियुक्ती केली. अर्थात, ठाकरेंना अभिप्रेत असलेलेच शब्द राऊत यांच्या लेखणीतून उतरतात ही अनेक वृत्तपत्रात असलेली वस्तुस्थिती इथेही कायम आहे.
संजय राऊत यांच्या रोखठोक संपादकीयातून नेहमी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी अर्थात ठाकरेंना अभिप्रेत असलेली भाषाच बोलली जाते. 1992-93 च्या दंगलीपासून ते आजतागायत ही भाषा आहे तशीच कायम राहिली. मग भाजपला कमळाबाई म्हणून हिणवण्यापासून नोटबंदी, जीएसटीसारख्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाभाडे काढेपर्यंत भाषेत फरक पडला नाही.
लेखांमध्ये वापरलेले शब्द चॅनेल्सची आणि वृत्तपत्रांची हेडलाइन्स बनू लागले. Shivsena mouthpiece – today stated, हे वाक्य इंग्रजी माध्यमात शिवसेनेची भूमिका मांडण्याकरता परवलीचे ठरू लागलं. दंगलीच्या काळातल्या अग्रलेखांची आठवण आजही काढली जाते. अर्थात, ती भाषा फक्त ठाकरे आणि शिवसेनेलाच शोभते. मुखपत्राचे कार्यकारी संपादक पद सांभाळणं सुरू केल्यानंतर सुमारे 12 वर्षांनी म्हणजे 2004 साली राऊत पहिल्यांदा राज्यसभेवर गेले आणि तेव्हापासून शिवसेना नेता-खासदार, म्हणून त्यांची जबाबदारी अर्थात वाढली होती.
स्व. प्रमोद महाजन यांच्या अकाली मृत्यूनंतर मोठ्या पदावर पोहोचलेल्या नेत्यांना जेवढा बाळासाहेब यांच्याबद्दल आदर वाटायचा तितकाच किंवा त्याहून जास्त ते राऊत यांच्या लिखाणाचा तिरस्कार करतात. आमच्यावरील टीकेपायी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेली युती तुटू शकते असे इतरही नेते सांगू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आपण मुखपत्र वाचत नाही हे सांगणे पसंत केलं होतं. पण कितीही टीका झाली तरीही राऊत यांचं वर्चस्व कमी न होता उलट वाढत गेलं. शिवसेनेच्या आक्रमक प्रवृत्तींचा, हिंसक घटनांचा त्यांनी बिनधास्तपणे पुरस्कार केला. हे सगळं आज आठवायच कारण गेले आठवडाभर दृष्टिपथात कुठेही नसलेल्या मुख्यमंत्री पदाकरता ज्या पद्धतीने संजय राऊत फिल्डिंग लावत आहेत त्यामुळे. भाजपहून जवळपास निम्म्या जागा कमी असूनही ज्या पद्धतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरचा दावा लावून धरला आहे त्यामुळे ते जास्त चर्चेत आहेत.
27 वर्षे कार्यकारी संपादक पद सांभाळणारे राऊत यांची सुरुवात त्यांच्याच भाषेत एक क्राईम रिपोर्टर म्हणून झाली. एका नावाजलेल्या साप्ताहिकापासूनचा त्यांचा प्रवास सांगण्याची ही वेळ नाही किंवा गरजही नाही. पण आपल्या लेखातील भाषेमुळे राऊत तसे अनेकांच्या हिटलिस्टवर आहेत किंवा होते.पण बाळासाहेब किंवा उद्धव यांना अभिप्रेत असलेलेच शब्द त्यांच्या माध्यमातून लेखणीद्वारे उमटतात. 2005 ला जेव्हा राज ठाकरे यांनी आपली वेगळी चूल मांडली तेव्हा मन सैनिकांचा राग राऊत यांच्या कारवर निघाला. तर एसीमध्ये बसून अग्रलेख लिहिणं सोपं आहे, अशा अर्थाची मल्लिनाथी राज यांनीही केली होती.
मात्र, राऊत यांच्या गुजराथी लोकांच्या विषयी लिहिलेल्या एका अग्रलेखापासून मातोश्रीने जबाबदारी झटकली होती. मुंबईत शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे घराण्याचे निकटवर्तीय गणले जाणारे राऊत दिल्लीत मात्र पवारांचे निकटवर्तीय बनतात. आणि म्हणूनच की काय पवार जेव्हा ईडीच्या कार्यालयात जायला निघाले तेव्हा त्यांना राऊत भेटून गेले आणि सुडाचे राजकारण महाराष्ट्रात योग्य नाही अशी त्यावेळी समर्पक वाटणारी टिप्पणीही केली. मनोहर जोशी यांचा ओढा नेहमी भाजपशी जुळवून घेण्याकडे असायचा. कदाचित भाजपच्या ज्येष्ठ मंडळींशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध हे त्याला कारण असेल. स्व. प्रमोद महाजन हे वरळीतल्या जोशींच्याच फ्लॅटमध्ये राहायचे.
बाळासाहेब अपवादात्मक घटना वगळता जोशींचेच ग्राह्य मानायचे. पण या शतकाच्या पहिल्या दशकात स्थिती पालटली. सेनेच्या सर्व निर्णयात उद्धव ठाकरे यांचा खास टच जाणवू लागला तसेच सल्लामसलतींमध्ये जोशींची जागा राऊत यांच्याकडे आली. त्यांचा ओढा भाजपपेक्षा राष्ट्रवादीकडे जास्त असतो हे अनेकांना जाणवलं. पण असं जरी असलं तरीही राऊत आपल्या मनाचा आणि ठाकरेंना मान्य नसलेला एक तरी शब्द लिहीत असतील याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे प्रत्येक राजकारणी-मालक-संपादकाला लागू असणारे अलिखित नियम इथेही लागू आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरेंना अभिप्रेत असलेलेच विचार आणि शब्द संजय राऊत लिहितात.
महाभारतात संजय कुरुक्षेत्रावरचा इतिवृत्तांत दिव्य दृष्टीने धृतराष्ट्राला सांगत तसे ठाकरेंच्या मनातला इति वृत्तांत हे संजय जनतेला सांगतात. मी ते मुखपत्र वाचत नाही, असं म्हणणारे देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना वाचाल तरच वाचाल अशी गर्भित धमकी देणारं वाक्य सांगायला ते विसरत नाही ते केवळ प्रथम बाळासाहेबांच्या आणि आता उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे संजय उवाच हे उगाच नसून ते खरंच आहे कारण ते ठाकरे उवाच असंच म्हटलं पाहिजे.