जयेश राणे
चीनच्या तीन सरकारी कंपन्यांनी बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसमवेत 50 शहरांमध्ये “फाइव्ह जी’ सेवा सुरू करीत असल्याची घोषणा केली. चायना मोबाइलच्या प्रमुख स्पर्धक कंपन्या असणाऱ्या चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न यांच्या वेबसाइटवरही ग्राहकांसाठी विविध योजना आणि ऑफरची माहिती देण्यात आली आहे.
डिसेंबरअखेरीस चीनमधील पन्नासहून अधिक शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये “फाइव्ह जी’ने चीनमधील सरकार आणि उद्योगांचे लक्ष वेधले आहे. या माध्यमातून क्षणार्धात चित्रपट डाउनलोड करण्यासाठीच नव्हे तर, सेल्फ ड्रायव्हिंग कार, रोबोटिक सर्जरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक नियंत्रणासाठी होण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होणे आवश्यक असते. आपल्या शेजारचे एक राष्ट्र महत्त्वाची सेवा चालू करते आणि येथे मात्र अन्य नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनवर 6 पैसे आकारणे चालू झाले आहे. त्यामुळे भारतात 5जी सेवा कधी दाखल होईल? याविषयी आताच सांगणे धाडसाचे ठरेल. ज्यांनी 3 वर्षांपूर्वी या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली ते म्हणजे “जिओ’. पैसे आकारण्याविषयी त्यांनी जे आता अंमलात आणले आहे, ते आधीपासूनच त्यांच्या विचाराधीन होते.
अशी काही ग्राहकांतच चर्चा आहे. ग्राहकांना आकर्षित करून त्याच ग्राहकांकडून हक्काने पै न पै वसूल केली जात आहे. 4 जी तंत्रज्ञानाच्या कार्यक्षेत्रात गत 3 वर्षांत नेट सुविधा, कॉल यांविषयी कायापालट झाला, हे वास्तव आहे. मात्र म्हणून त्याचा अपलाभ उठवत ग्राहकांकडून पैसे वसुली करणे कितपत न्याय्य आहे? ग्राहक त्यांच्या रिचार्जचे पैसे भरत आहेतच. त्यात त्या आस्थापनाचाही फायदा आहे. असे असताना ग्राहकांना अधिक काही देणे परवडत नसेल, तरी आहे त्यातच ते समाधानीही आहेत. असे सर्व असताना नवीन खेळी खेळली गेली आहे. “ट्राय’ने (दूरसंचार नियामक) सांगितले. त्यानंतर लागू केले असे आहे, तर बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार कंपनी आहे. ते ग्राहकांना प्रत्येक कॉलवर 6 पैसे देण्यास अनुकूल आहेत आणि दुसरीकडे 6 पैसे आकारले जात आहेत, असे का? बीएसएनएलची आर्थिक स्थिती किती खालावलेली आहे याविषयी वेगळे सांगायला नको.
काहीजण म्हणत होते की पैसे आकारणे योग्य आहे. त्यांनी काही धर्मशाळा काढलेली नाही, तेही व्यवसाय करण्यासाठी आले आहेत वगैरे. ज्यांना त्यांचा पुळका आहे, ते सधन असतील, ज्या आस्थापनात ते काम करत असतील ते त्यांचे देयक भरत असेल अशा शक्यता नाकारता येत नाही. कारण भरल्या पोटीच नको त्या गोष्टी सुचत असतात. त्याच पठडीतील हा प्रकार असावा. 1500 रुपयांचा जिओचा फोन घेतला आहे. त्या फोनच्या वापराच्या समाधानापेक्षा त्या फोनच्या तांत्रिक अडचणींमुळे अक्षरशः वैताग आला आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही अडचणींचा सामना करावा लागल्याने नक्की हा फोन बाजारात का आणला? असा प्रश्न कोणालाही पडेल. असे किती त्रस्त ग्राहक असतील? 1500 रुपयांना काही मोल नाही का? ते फुकट आले आहेत का? त्या फोनच्या तांत्रिक अडचणींत सुधारणा करण्याचे काय? ग्राहकांनी यांच्या सर्व्हिस सेंटरच्याच चकरा मारण्यात वेळ खर्ची घालायचा का? या सूत्राचा येथे संबंध काय? असे काहीजणांना वाटू शकते.
ग्राहकांकडून त्यांनी 6 पैसे आकारणे चालू केले आहे. दुसऱ्या बाजूला हजारपेक्षाही अल्प मूल्याचा फोन बाजारात आणला आहे. असे सर्व चालू असताना ग्राहकांनी डोळसपणे विचार करणे आवश्यक आहे की 1500 रुपयांच्या फोनविषयी काय लोकानुभव आहे? 6 पैसे आकारण्याविषयी आपल्याला का विचारावेसे वाटत नाही? बाजारात गृहोपयोगी वस्तूंचे दर वाढल्यास विक्रेत्यावर प्रश्नांचा भडीमार होतो. येथे मात्र ग्राहकांना काहीच प्रश्न नाही. तुम्ही जिथे बोट दाखवणार ती पूर्व दिशा अशा भूमिकेत ग्राहक दिसतो. त्यामुळे ग्राहक हा ग्राहकच राहिला आहे. तो ग्राहकराजा बनू शकलेला नाही.
6 पैसे आकारणे चालू झाले तरी ग्राहकांतून या विरोधी काहीच आवाज नाही. याचा अर्थ ग्राहकांना 6 पैशांचे मोल नाही. पण तेच मोल हा दर आकारणाऱ्यांना आहे. हे लक्षात येत आहे का? “थेंबे थेंबे तळे साचे’, असे केवळ वाचून, ऐकून काय उपयोगाचे? तळे कसे भरायचे हे 6 पैशांचीही जमवाजमव करणाऱ्यांना चांगलेच ज्ञात आहे. पण ग्राहकांना हे कधी कळणार? आज 6 पैसे द्यावे लागत आहेत. उद्या त्यात कितीपटींनी वाढ होईल, हे ग्राहकांना माहीत नसले तरी ते आकारणाऱ्यांना नक्कीच माहिती असेल असे का म्हणू नये? दर आकारणाऱ्यांनी ते आकारायचे आणि ग्राहकांनी ते निमूटपणे पदरात पाडून घ्यायचे, असे सर्वकाही चालू आहे. ग्राहक काही बोलणार नाहीत. याची कल्पना असल्याने नव्हे आत्मविश्वास असल्यानेच ते पाऊल टाकण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांचा रिमोट म्हणजे नियंत्रण अन्य कोणाच्या तरी हातात आहे, हे स्पष्ट आहे. दूरसंचार क्षेत्रातील सुविधेवर (व्हाइस कॉलवर) नव्याने चालू केलेली दर आकारणी ग्राहकांनी स्वीकारलेली असली, तरी उद्या सध्या उपयोगात असलेल्या फोर जी नेटवरही असाच काहीसा दर लावला जाईल का? असा प्रश्न पडतो.