नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातील महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून आपापल्या परीने आश्वासन देण्यात येत आहे. त्यातच आता या निवडणुकीच्या मैदानात हिंदू महासभा देखील उतरली आहे. या निवडणुकीत हिंदू महासभेने मेरठ महापालिकेवर आमची सत्ता आल्यास सर्वप्रथम मेरठ या शहराचे नाव बदलून ‘नथुराम गोडसे नगर’ असे करू, असे आश्वासन दिले आहे.दरम्यान, हिंदू महासभेने दिलेल्या या आश्वासनाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदू महासभा मेरठ महानरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. येथे हिंदू महासभेतर्फे सर्व जागांवर उमेदवार उभे केले जाणार असून त्यांनी येथील जनतेला मेरठ शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. मेरठचे नाव आम्ही नथूराम गोडसे नगर करू, देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याला आमचे प्राधान्य असेल. त्यानंतर गोमातांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांची इस्लामिक नावे बदलून त्यांना हिंदू महापुरुषांची नावे दिली जातील, अशी अनेक आश्वासनं हिंदू महासभेने दिली आहेत.
याबाबत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. “हिंदू महासभेचे पुरेसे नगरसेवक निवडून आले आणि आमचा महापौर झाला तर आम्ही मेरठ शहराचे नाव नथुराम गोडसे नगर असे करू. तसेच मेरठ शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांना हिंदू महापुरुषांची नावे दिली जातील,” असे शर्मा यांनी सांगितले. ही निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू महासभेकडून देशभक्त उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. धर्मांतर रोखण्यासही आम्ही प्राधान्य देऊ, असे हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हिंदू महासभेने भाजपा आणि शिवसेनेवरदेखील टीका केली आहे. भाजपाला हिंदुत्ववादी पक्ष म्हटले जाते. मात्र या पक्षात आता अन्य समाजाच्या लोकांचे वचर्स्व वाढत आहे. अगदी अशाच पद्धतीने शिवसेना हा पक्षदेखील मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे, असे हिंदू महासभेच्या मेरठ जिल्हाध्यक्षांनी म्हटले आहे.