आशिष शेलार यांचे सेनेला सडतोड प्रत्युत्तर
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही शिवसेना आणि भाजपा यांच्यातले शाब्दीक द्वंद्व अद्याप सुरु आहे. शनिवारी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर बोचरी टीका केली. शिवसेनेने भाजपाचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी…अशा भाषेत सेनेने भाजपाला टोला लगावला आहे.
पत्रपंडित आता बदललेत? नव्या विचारधारेची लाली पावडर लावून
“बडे की बिर्याणी” व “इटालीयन पिज़्ज़ा” खात, सरकारची “सच्चाई” ते लिहितात?
भाजपचं 30 वर्ष ओझं होतं? आता दोघांना सोबत घेतलेय,ती काय ओझ्याची गाढवं आहेत का?
ओझं उतरलं की, कोण कुणाच्या नजरेतून उतरलंय? हाच खरा “रोखठोक” सवाल आहे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 21, 2019
शिवसेनेच्या या टीकेवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे 30 वर्ष ओझे असेल तर आता दोघांना सोबत घेतले आहे ती ओझ्याची गाढवं आहेत का?? अशा शब्दांत शेलारांनी सेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेसाठी दरवाजे अजूनही खुले असल्याचे वक्तव्य केले होते.