नवी दिल्ली – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकलबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकाने लोकल सुरू करण्याची मागणी केली तर रेल्वे मंत्रालय लगेच त्यास मंजुरी देईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
करोनाची स्थिती आटोक्यात आली असे जेव्हा राज्याला वाटेल, तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल. रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबई लोकलबद्दल रेल्वेशी चर्चा करायला तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार रेल्वेकडेच आहे. तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे प्रशासनासोबत मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारला पुढील चर्चा करता येईल. अखेर रेल्वे सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनच घेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.