यवत येथील घटना; पोलीसांनी केला गुन्हा दाखल
यवत – कांद्याच्या बाजारभावाने चांगलीच उसळी घेतली आहे. याच कारणातून वखारीत साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अशाच प्रकारे दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीतून शेतकऱ्याने वखारीत साठवून ठेवलेल्या दोन टन कांद्याची चोरी झाल्याची घटना गुरुवारी (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या चोरीच्या घटनेत शेतकरी सतीश गोपीचंद लकडे (वय 38, रा. नाथाचीवाडी, ता. दौंड) यांचे चालू बाजार भावाप्रमाणे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील काळात कांद्याला बाजारभाव नव्हता त्यावेळी शेतकरी उत्पादकांना बाजारात आपला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत होता. त्यावेळी उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. आता कांद्याला चांगला बाजारभाव आहे. मात्र, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
याबाबत यवत पोलिसांनी सांगितले की, बाजारभाव वाढल्याने कांदा चोरीच्या घटना वाढत आहेत. शेतकरी सतीश लकडे यांची यवत गावच्या हद्दीत गट क्रमांक 301 मध्ये शेती असून लकडे यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला कांदा साठवण्यासाठी लोखंडी वखार बनवली आहे. या वखारीत पंधरा टन कांदा साठवून ठेवला होता, त्यापैकी काही कांदा लकडे यांनी बाजारात विकला. परंतु, बंद वखारीचे कुलूप तोडून चोरट्यांनी (दि.26) रात्रीच्या सुमारास दोन टन गर्वी उन्हाळी जातीचा कांदा चोरून नेला. सतीश लकडे हे शुक्रवारी (दि.27) सकाळी आपल्या शेतावर गेल्यावर कांद्याची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चालू बाजार भावाप्रमाणे चोरी झालेल्या कांद्याची किंमत 35 ते 40 हजार रुपये आहे. वखारीतून कांदा चोरी झाल्याची तक्रार लकडे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.