मुंबई : शरद पवार यांच्यावर झालेल्या आरोपामुळेच व्यथीत होऊन सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मी राजिनामा दिला. ज्या राज्य सहकारी बॅंकेकडे ठेवीच साडेअकरा हजार कोटीच्या आहेत, त्यात 25 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होईलच कसा? एनपीएत असणाऱ्या मंत्र्यांच्या कारखान्यांना अर्थसंकल्पात तरतुद करून या सरकारने मदत केली, तशीच मदत शिखर बॅंकेत केली. त्यात केवळ माझे नाव होते म्हणून हे प्रकरण बाहेर आले, मी नसतो तर हे प्रकरण बाहेरच आले नसते, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी आमच्यात कोणताही गृहकलह नाही. शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतीम असतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे उद्विग्न होऊन पवार यांनी राजिनामा दिला, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. कौटुंबिक कलहातून अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी जयंत मुंडे, छगन भूजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर उपस्थित होते.
आम्ही अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंक चालविली. बॅंकेत जर घोटाळा केला असता तर बॅंकेला 285 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असता का? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, काही नैसर्गिक कारणे अथवा अन्य काही गोष्टीमुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काही वेळा नियम बाजूला सारून मदत करावी लागते. ते सारे कर्ज फेडले गेले आहे. छत्रपती आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ऊस जातो म्हणून शरद पवार या संस्थांचे सभासद आहेत. याशिवाय कोणत्याही सहकारी संस्थेत शरद पावर सभासद नाहीत. तेव्हा बॅंकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध काय? ज्यांच्यामुळे मला उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. त्यांच्यावर या प्रकरणात आरोप झाल्याने मी अत्यंत अस्वस्थ झालो. त्यामुळे मी कोणालाही न सांगता मी राजीनामा दिला, असे ते म्हणाले.
अश्रु अनावर
माझ्या या निर्णयाने जे हितचिंतक आणि समर्थकांना वेदना झाल्या त्यांची मी माफी मागतो, असे सांगताना या घटनेने याविषयी चर्चा होणार याची कल्पना होती. असे सांगताना अजित पवार यांना अश्रु आवरता आले नाहीत.
राजीनामा दिल्यानंतर मी मुंबईतच होतो. माझ्या अस्वस्थतेमुळे मी काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. त्यामुळे मी कोणअशी बोललो नाही. शरद पवार यांनी मला मी मुंबईत येत आहे, मला येऊन मला भेट असे सांगितले. त्यामुळे त्यांना मी भेटलो. त्यांच्या नजरेला नजर मी भीडवू शकलो नाही. त्यांनी मला काय सांगायचे ते सांगितले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले
राजकारणात सकाळी सातपासून आम्ही लोकांना भेटतो. 12 -12 तास काम करतो. त्याबदल्यात मिळते काय तर विनाकारण होणारे आरोप. त्यामुळेच मी मुलाला तु शेती-उद्योगात जा. राजकारणात नको असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मला राजिनामा देण्याचे कारण विचारले. त्यावेळी मी त्यांनाही व्यक्तीगत कारणाने राजिनामा देत असल्याचे सांगितले, असे अजित पवार म्हणाले.