पेठ, (वार्ताहर) – येथील गावांमध्ये आणि वाडीवस्त्यांवर भुरट्या चोरांनी अनेक ठिकाणी हात साफ केल्याचे दिसून येते. पेठ गावच्या उपसरपंच महिला वैशाली मनोज पवळे (रा. संभायावस्ती, पेठ) यांचे ज्वारी भरून ठेवलेले 80 किलो वजनाचे आठ कट्टे चोरीला गेले आहे. त्यामुळे या महिलेचे 20 ते 25 हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला आहे.
बारामनवस्ती येथील प्रभाकर दत्तात्रय बुट्टे या शेतकर्याचे ज्वारीचे 80 किलो वजनाचे चार कट्टे चोरीला गेले आहेत. जुन्या घरासमोरील बांधलेल्या नवीन घरामध्ये ज्वारीचे कट्टे ठेवले होते. पहाटेच्या वेळी जनावरांना चारा टाकण्यासाठी बुट्टे उठले असताना नवीन घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे चोरी झाल्याचे त्याना समजून आले. तसेच पेठ येथील माळ वस्ती येथील दत्तात्रय बबन धुमाळ या शेतकर्याच्या घरी काल दिवसा चोरीचा प्रयत्न झाला.
दत्तात्रेय धुमाळ आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेले असताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील सामान कपडे यांची उचकापाचक केली पण त्यांच्या हाताला काही लागले नाही. घरातील दुसर्या कपाटामध्ये सोन्याचा ऐवज, पैसे होते पण बाहेर कोणाची तरी बहुतेक चाहूल लागल्यामुळे चोरटे निघून गेले. त्यामुळे सुदैवाने तो मौल्यवान ऐवज वाचला.
पेठ कुरवंडी रस्त्यावरील अनुसया बंगला येथे चार दिवसांपूर्वी रात्री अडीचच्या सुमारास आशुतोष अविनाश धुमाळ हा युवक रात्री कामावरून आपली गाडी घेऊन आला असता गेट उघडण्यासाठी गाडी थांबवली असता गाडीवर चोरट्यांनी डाव्या बाजूने दगड मारून काच फोडली आणि चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पेठमध्ये साधारणपणे महिनाभरापूर्वी भर बाजारपेठेमध्ये एका ज्येष्ठ महिलेला सुद्धा चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना ताजी असताना या आठवडाभरातील चोरीच्या घटनांनी नागरिक आणि ग्रामस्थ भयभीत झालेले आहे.
खंडोबा माळ वस्ती येथील कैलास धुमाळ यांच्या घरातील सुद्धा ज्वारी कट्टा चोरीला गेला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी वाकचौरे वस्ती येथील बाबाजी भगवान वाकचौरे हे कामानिमित्त मुंबईला असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री बंगल्याचे कडी कोयडा तोडून आत मध्ये प्रवेश केला आतील कपाटाची उचकापाचक केली पण कपाटात काही नसल्यामुळे मोठी हानी टळली.
पेठ परिसरातील वाडी वस्त्यांवर धान्य आणि किरकोळ ऐवज गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहे. नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी आपले धान्य, सोनं किंवा घरातील मौल्यवान ऐवज असेल याची काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी ठेवावा.-मुरलीधर धुमाळ, संचालक पेठ विविध कार्यकारी सोसायटी