पूरग्रस्त जनाबाई चांदणे या महिलेची संसार उभा करण्यासाठी धडपड सुरू
येरवडा – घरात अचानक पाणी शिरले आणि पै…पै उभा केलेला संसार पुरता बुडून गेला…अगदी भिशीचे मिळालेले पैसे सुद्धा पाण्यावर तरंगत होते… आता पूर ओसरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संसार उभा करण्याची धडपड सुरू झाली आहे. हे सांगताना शांतीनगर येथे राहणाऱ्या जनाबाई चांदणे यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सगळे वाहून गेले असले तरी “हिम्मत अभी बाकी है’ हाच विश्वास मात्र, त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता.
पालिकेने हाती घेतली स्वच्छतेची मोहीम
महापालिकेकडून शांतीनगरमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली असून (मंगळवारी) दुपारी पाणी कमी झाल्यानंतर वसाहतीमधील नागरिकांनी घरे स्वच्छ केल्यानंतर नागरिकांच्या घरातला कचरा रस्त्यावर टाकला होता.
पालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच युद्धपातळीवर स्वछता मोहीम हाती घेतली आहे. 35 स्वच्छता सेवक या ठिकाणी कामकरिता आहे.
रोजची कामे करून हे काम हाती घेतले असले तरी हा सर्व परिसर साफ करण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक घावटे यांनी सांगितले.
सामाजिक संस्था मदतीला धावल्या
स्थलांतरित केलेल्या नागरिकांना स्थानिक नगरसेवकांकडून नागरिकांची सकाळचा चहा, नाश्ता आणि दोन्ही वेळच्या जेवणाची योय केली जात आहे. अनेक संस्था संघटनांकडून मदत दिली जात असून अनेक संस्था संघटनांकडून मदत दिली जात असून दि हुसेन शाह बाबा ट्रस्टच्या माध्यमातून नागरिकांना दोनवेळचे जेवण दिले गेले. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना चहा आणि नाश्ता देण्यात आला. भीम आर्मी संघटनेकडूनही परिसरातील नागरिकांना स्वच्छतेसाठी निरमा पावडरचे पाउच आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले.
काही जणांकडून फोटोसेशन
काही जण मदत करत आहेत. मात्र, मदत करतानाचे फोटो हे सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमात झळकण्यासाठी पोज देत फोटो काढत आहे. त्यामुळे मदतीच्या नावाखाली फोटोसेशन सुरू असल्याबद्दल पूरग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.