नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये ज्या दंगली भडकल्या आहेत त्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही विरोधकांनी आणला आहे. दोन दिवसांपासून या अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या कालच्या भाषणातील काही शब्दांना आता कात्री लावण्यात आली आहे.
मंगळवारपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे त्यातच काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी असे शब्द वापरले ज्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. सदनातील सदस्यांनी या शब्दांवर तातडीने आक्षेप घेतला. हत्या, खून, देशद्रोही अशा जवळपास १२ शब्दांवर सभागृहाने आक्षेप घेतला आहे. हे सगळे शब्द आता त्यांच्या भाषणातून हटवण्यात आले आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी राहुल गांधींनी त्यांचे भाषण सुरु केले. त्यानंतर पाचच मिनिटात हे शब्द वापरण्यास सुरुवात केली. जेव्हा भारतमातेचा मणिपूरमध्ये खून झाला आहे हे वाक्य राहुल गांधींनी उच्चारले तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनीही त्यांना समज दिली. आता हे सगळे शब्द त्यांच्या भाषणातून काढण्यात आले आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. त्यांनी हा आरोप केला की मणिपूर या राज्यात भारतमातेची हत्या झाली आहे. भारतमातेची हत्या करणारे लोक हे देशद्रोही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरचा दौरा करत नाहीत कारण त्यांना मणिपूर हे भारतात आहे हेच मान्य नाही. राहुल गांधी यांनी जेव्हा हा उल्लेख केला तेव्हा सत्ताधारी बाकांवरचे सदस्य उठून उभे राहिले आणि राहुल गांधींना विरोध दर्शवू लागले. राहुल गांधींना विरोध केला जात असताना राहुल गांधी यांनी मणिपूरला आलेला अनुभव सांगितला आणि थेट सरकारवर आरोप केला की, “तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. भारतमातेची हत्या केली आहे.”
“तुम्ही (सत्ताधारी) देशद्रोही आहात, देशप्रेमी नाही. तुम्ही भारतमातेचे खुनी आहात म्हणूनच तुम्ही मणिपूरला जात नाही. भारतमाता ही माझी माता आहे. माझी एक आई इथे संसदेत बसली आहे तर माझी दुसरी आई म्हणजे भारतमाता आहे. तिची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली. आज वास्तव हे आहे की मणिपूरमध्ये तुम्ही विभाजन केलं आहे. मणिपूरमध्ये तुम्ही केरोसीन शिंपडलं आणि तसंच देशाच्या इतर राज्यांमध्येही तुम्हाला केरोसीनच शिंपडायचं आहे” असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणा दरम्यान बराच गदारोळ झाला. त्यानंतर आता त्यांच्या भाषणातले १२ शब्द वगळण्याचा निर्णय झाला आहे.