रायपूर : छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा या नक्षलवादी प्रभावित जिल्ह्यामध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले. तर 21 जवान अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील नक्षलवादी विरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक ओपी पाल यांनी ही माहिती दिली.
मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार , 14 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.
दरम्यानं, नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांचे 12 जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं.
या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे.