वाल्हे (वार्ताहर): लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आज मंगळवारी वाल्हे (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजार काही अटी व शर्तीवर सुरू करण्याचा निर्णय सोमवारी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. त्याअनुशंगाने वाल्हे येथील आठवडे बाजारांमध्ये शासनाने ठरवलेल्या नियमांचे पालन करून, स्थानिक व्यापारी, तसेच शेतकरी यांनी आपला भाजीपाला विक्री केला.
तसेच बाजारामध्ये येणा-या प्रत्येकाला मास्क किंवा रूमालाचा वापर बंधनकारक केला होता. त्यानुसार बाजारामध्ये आलेल्या व्यक्तीने मास्क किंवा रूमालाचा वापर केला नसेल तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी स्वतः त्याव्यक्तीला मास्क किंवा रूमालाचा वापर करावयास सांगत होते.
सकाळी दहा वाजता आठवडे बाजार सुरू झाला. यापूर्वी सरपंच अमोल खवले, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार, अंजली कुमठेकर, पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, समीर हिरगुडे, बी.व्ही जगदाळे तसेच वाल्हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी बाजारातील सर्व दुकाने यांच्या मध्ये सहा फुटाचे सुरक्षित अंतर ठेवत त्यांना बसण्याची ठिकाणे मार्क् करून देऊन, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
तसेच बाजारामध्ये शेतकरी व स्थानिक व्यापारीवर्गाव्यतिरीक्त बाहेरच्या गावामधून कोणी येणार नाही यांची दक्षता पोलिस तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचारीवर्गाने योग्य ती खबरदारी घेतली. त्यामुळे वाल्हे येथील आठवडे बाजारांमध्ये शासनाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व नियमांचे पालन करीत आठवडे बाजार पार पडला.