कामेरी – मुंबईतून जानाईनगर (वर्णे, ता. सातारा) येथे आलेल्या एकाचा करोना चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि. 19) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने वर्णे परिसरात खळबळ उडाली होती. परंतु, संबंधित बाधित रुग्ण तेथे आलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या कुटुंबासह खारघर (मुंबई) येथून खासगी वाहनाने जानाईनगर, वर्णे येथे येण्यासाठी निघाली होती. पण वर्णे येथे न येता ती व्यक्ती कुटुंबीयांना घेऊन जकातवाडीत आपल्या बहिणीच्या घरी रविवारी (दि. 17) पोहचली.
तेथेच त्याला त्रास होऊ लागल्याने तो स्वत: सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. तेथे त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तेथे त्याचे मूळ गाव म्हणून वर्णे- अभेपुरीची नोंद करण्यात आली. याबाबतची माहिती रुग्णालयातून मिळाल्यावर जिल्हा प्रशासनाने तालुका आरोग्य विभागाला पुढील कार्यवाहीची सूचना दिली; परंतु रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता, संबंधित रुग्ण गावात आला नसल्याचे समजले. बुधवारी सकाळी माहिती घेतल्यानंतर संबंधित रुग्णाचे मूळ गाव वर्णे- अभेपुरी असले तरी तो गेले वर्षभर गावात आलाच नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे वर्णे व परिसरातील ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतरही खबरदारी म्हणून गावात त्याच्या घरातील इतर लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नांदगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. एम. पी. रायबोले, बोरगावच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, सरपंच रसिका काळंगे, उपसरपंच अशोक भोसले, ग्रामसेवक देवानंद निकम, आरोग्य कर्मचारी बोधे यांनी गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबई, पुणे व इतर ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांचे घरातच विलगीकरण करून त्यांना शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे.