नगर -करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या शहरांतून गावांमध्ये मोठे लोंढे येवू लागल्याने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. याशिवाय पंचायत समितीला दैनंदिन अहवाल पाठवणे, गरजूंना अन्नधान्याची मदत, परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करणे अशा कामांचा ताण वाढत आहे. या परिस्थितीचा विचार करता ग्रामसेवकांचे काम करताना मानसिक खच्चीकरण होत असून सरकारने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.
मोठ्या शहरांतून ग्रामीण भागात स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. या सर्वांची गावाच्या सीमांवरच नोंदणी करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करणे अशा कामांचा बोजा वाढला आहे. आतापर्यंत शांत असलेल्या ग्रामीण भागात या लोंढ्यांमुळे ताण वाढलेला आहे. विशेषत: परगावहून गावात आलेल्यांच्याबाबतीत ठोस धोरण राबविताना ग्रामसेवकांना गावागावात असलेले राजकारण, गटतट याचाही सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम ग्रामसेवकांच्या शारीरीक व मानसिक स्वास्थ्यावर होत आहे.
अनेक ग्रामसेवक धास्तावले आहेत. कर्तव्य बजावताना कितीही काळजी घेतली तरी दररोज अनेकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे मनात करोना संसर्गाची कायम भिती असते. या भितीपोटी घरी जावे की नाही, असाही प्रश्न निर्माण होतो. वास्तविक पाहता गावामध्ये एवढी मोठी अवाढव्य यंत्रणा राबवणे एकट्या दुकट्या ग्रामसेवकावर अन्याय करणारेच आहे. गावात ज्या ज्या समित्या स्थापन केल्यात त्याची सगळी जबाबदारी एकट्या ग्रामसेवकावर आहे.गावगाडा चालू राहील हे पाहताना गावाचे आरोग्य राखण्याची जबाबदारी ग्रामसेवकाच्या खांद्यावर आहे. हे ओझे जुलुमाचे ठरत आहे. राज्य सरकारने व प्रशासनाने यासर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन गावपातळीवर ग्रामसेवकांना काम करताना चांगले वातावरण राहिल याची दक्षता घेतली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे.