Selling the Village : महाराष्ट्राला अतिशय गौरवशाली इतिहास लाभला आहे. देशातील सर्वात विकसित राज्यांपैकी एक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पहिले जाते. राज्याची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. असे असताना मुंबईपासून पाचशे किलोमीटर अंतरावर असणारे एक गाव..तिथल्या गावकऱ्यांनी विक्रीसाठी काढले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की एका गावातील ग्रामस्थ आपले गाव विकत आहेत.
गावाबाहेर पोस्टर लावले
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात, लोकांनी संपूर्ण गाव विकण्यासाठी प्रवेशद्वारावर पोस्टर लावले आहेत. तसेच गाव विकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पोस्टर लावून परवानगी मागितली आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील 1800 रहिवाशांनी नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळेच गावाच्या प्रवेशद्वारावरच गावाच्या विक्रीचे पोस्टर लावले आहेत.
खरं तर… खडकवाडी गाव गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. गावाचा विकास केवळ कागदोपत्रीच झाला आहे. जमिनीवर विकासाच्या नावाखाली काहीही करण्यात आले नाही. विकासाच्या नावाखाली येणाऱ्या निधीतून गावप्रमुख व इतर अधिकारी आपले खिसे भरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक महत्त्वाकांक्षी योजना देऊन तुम्ही महाराष्ट्राला विकासाकडे नेत असल्याचे सांगता मात्र पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे., अशा आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पोस्टर गावात लावण्यात आले आहे,
गावातील विकास प्रकल्प केवळ कागदावरच राहिले
शासनाने सुरू केलेले सर्व विकास प्रकल्प गावात केवळ कागदावरच आहेत. याठिकाणी विकासाच्या नावाखाली निधी उभारण्यात आला, मात्र जमिनीवर कोणतेही काम झालेले नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र आजतागायत कोणतीही सुनावणी झालेली नाही. आम्हाला हे गाव विकायचे आहे, आम्हाला तुमची परवानगी हवी आहे. ही परिस्थिती केवळ या गावापुरती मर्यादित नसून आजूबाजूच्या गावातही हीच परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने दिली जातात आणि जिंकल्यानंतर केवळ कागदावरच विकास केला जातो. अशा परिस्थितीशी लढण्यापेक्षा गाव विकलेले बरे, असे आवाहन गावातील लोकांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
दरम्यान, खडकवाडी गावच्या ग्रामस्थांनी लावलेल्या या पोस्टरची चर्चा सध्या राज्यभरात होत असून यावर राज्यसरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.