नवी दिल्ली : करोनाची साथ सुरू झाल्यावर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी आचारसंहितेनुसार “वर्क फ्रॉम होम’ सुरू केले. मात्र सोमवारपासून या मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात येऊन आपला पदभार सांभाळला.
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिज्जू आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सकाळी महत्वाच्या अधिकाऱ्यांसह कार्यालयात हजेरी लावली. त्याचबरोबर प्रत्येक मंत्रालयाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यासह आवश्यक एक तृतियांश कर्मचाऱ्यांसह उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
ज्या सहसचिव दर्जाच्या वरीष्ठ अधिकारी म्हणजे ज्यांना सरकारी वाहन सेवा उपलब्ध आहे, अशा अधिकाऱ्यांना सोमवारपासून कार्यालयात येणे अनिवार्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही उद्योग आणि सेवांना मर्यादित प्रमाणात आपले काम सुरू करू द्यावे अशी शिफारस उद्योग आणि अंतर्गत व्यापास वाढ खात्याने केंद्रीय गहमंत्रालयाला केली आहे. लॉकडाऊनची 14 एप्रिलनंतर मुदतवाढ देताना त्यात काही सवलती जाहीर करण्याचा केंद्राचा विाचार आहे, त्यानुसार ही शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देशांत नऊ हजार 152 जण करोना बाधित असून 308 जण मरण पावले आहेत. तर 806 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.