मालेगाव – विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मालेगाव तालुक्यातील झोडगे गावात घडली. पिण्याच्या पाण्यासाठी दोघींचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) अशी मृत आई व मुलीची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी या दोघी मायलेकी गावाजवळ असलेल्या एका विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या पोहऱ्याने पाणी बाहेर काढत असताना अचानक विहिरीत पडल्या. सायंकाळी या विहिरीवर आलेल्या एका पशुपालकाला या दोघींचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. त्यानंतर त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव स्थित सामान्य रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरा मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी दोघी मायलेकीचा बळी गेल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा आता तीव्र परिणाम दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश भागत पाणी पातळी खालावली आहे. विहिरी, बोअरवेल कोरडे पडत आहेत. अनेक गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दुरून पाणी आणावे लागत आहे. अशातच काही दुर्घटना घडत आहेत.