राजकीय शिखर उंच गाठले असूनदेखील कोणताही बडेजाव न करता केवळ जनतेच्या हितासाठी कायम रात्रंदिवस कार्यरत असणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सर्वदूर ख्याती आहे. या त्यांच्या कार्य कर्तृत्वाला आमचा सलाम. ज्या काटेवाडी गावात अजितदादांचा जन्म झाला. त्या गावात आम्ही जन्माला आलो, हे आमचे भाग्य! लहानपणापासूनच अजितदादांच्या बाबतीत एक मनामध्ये वेगळीच “क्रेझ’ निर्माण झाली होती. अजितदादा पवार हे कसे असतील; परंतु ते कडक, स्पष्टवक्ते असले तरी मनाने तेवढेच हळवे देखील आहेत, याचा अनुभव त्यांच्या सानिध्यातील प्रत्येकाला आला आहे.
दादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक अडचणींचा सामना करत आज राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळविले आहे. या अगोदरही त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. दादांनी राजकीय क्षेत्रामध्ये केलेली प्रगती व त्या राजकीय क्षेत्राचा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला उपयोग व अजूनही अहोरात्र काम करण्याची ताकद असलेला नेता म्हणून त्यांचे नेहमीच कौतुक होत आहे. आजही दादा जोमाने काम करत आहेत की, तरुणांनादेखील त्यांचा हेवा वाटत आहे. त्यांच्या कामामुळे तरूणांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. केवळ तीन ते चार तास रात्रीची विश्रांती घेऊन पुन्हा पहाटे उठून सकाळी सहा वाजता जनतेच्या सेवेसाठी दादा नव्या उमेदीने तयार असतात. राज्याची धुरा त्यांच्याकडे असल्याने त्यांचा सर्वत्र प्रवास होत असून देखील कधीही न थकणारे नेतृत्व म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.
बांधकाम, शेती, औद्योगिक क्षेत्रातील माहिती, शिक्षण, व्यावसायिक यांसह जनसामान्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडविताना त्यांचा आक्रमकपणा दिसत असला तरी त्यांच्याजवळ हे सर्व प्रश्न सोडवण्याची ताकद व संपूर्णपणे माहिती असल्याने न डगमगता सर्व प्रश्नांचे निरसन ते करतात. शासन दरबारातील त्यांचा असलेला दरारा यामुळे सर्व स्तरातील शासकीय योजना ज्या त्या विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायम पोहोचत आहेत. त्या योजना पोहोच झाल्या का नाही याबाबतही दादा कायम बारकाईने लक्ष ठेवतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी वर्गामध्येही त्यांचा दबदबा आहे.
राजकीय व्यक्तींना आपले राजकीय स्थान भक्कम करण्यासाठी नेहमीच कोणती ना कोणती तडजोड करावी लागत असते. कित्येक राजकीय नेते आपले स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांचा आधार घेत असतात; परंतु दादांसारखे असे एक खंबीर नेतृत्व आहे की, त्यांना त्यांचे राजकीय क्षेत्रातील स्थान भक्कम करण्याची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची गरज लागलेली नाही.
आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला व सर्व जाती- धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सर्वांना समान न्याय देण्याचे त्यांनी काम केले. एवढ्या मोठ्या क्षमतेने कार्य करणारा एकही नेता नाही व होऊ ही शकणार नाही.
दादांकडे काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. हा एकमेव नेता असा आहे की सत्ता असो वा नसो. जनतेचे काम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. एकमेव आमदार असा आहे की जो राज्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळवून विजयी झाला. राज्याचे नेतृत्व करताना दादांनी बारामती तालुक्याकडे बारकाईने लक्ष दिले.
आपल्या स्वतःच्या काटेवाडी गावावर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी सुनेत्रावहिनी पवार यांनी काटेवाडीला राज्यातील पहिला क्रमांकाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळवून दिला आहे. केवळ सुनेत्रावहिनींमुळे आज काटेवाडी गाव राज्यातच नव्हे तर देशात या गावाची ओळख निर्माण झाली आहे. माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आज राज्यातील अनेक प्रश्न सुटले जात असून देशाला आणि राज्याला उंचीवर नेण्याचे काम या सर्वांनी केले आहे. आज अजितदादांचा वाढदिवस, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो याच माझ्याकडून व माझ्यासारख्या असंख्य नागरिकांच्या वतीने शुभेच्छा!
शब्दांकन- गोकुळ टांकसाळे (भवानीनगर)