पिंपरी -रस्त्यावर पांढरे पट्टे मारत असलेल्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने उडाविले. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर सोमवारी (दि. 30) पहाटे रावेत येथे घडली. या घटनेत चार कामगार जखमी असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी तिघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साजिद खान (वय 25, सध्या रा. गहुंजे मूळगाव राजस्थान) असे अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर संदीप देखमुख, प्रल्हाद यादव, भोला कुमार आणि अनिल कुमार अशी जखमींची नावे आहेत.
सध्या तिघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्व कामगार रावेत येथील समीर लॉन्स परिसरात रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम करीत होते. पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना उडविले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.