अकोले -निसर्गाच्या शाळेत शिकत राहणे व समाजाला प्रेरित करत राहणे हे ध्येय आयुष्यात जपलेल्या तुकाराम भोरु गभाले (रा. मान्हेरे, ता.अकोले) या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाने सुमारे 20 ते 25 लाख विविध उपयोगी वृक्षांची लागवड आणि संवर्धन ग्रामस्थांच्या मदतीने केले आहे. शेतावर लावलेली झाडे म्हणजे आपले पेन्शन, निवृत्ती वेतन होय, असे ब्रीद जपत वन राजीचे संवर्धन करणारा वनपुरुष तसा प्रसिद्धी परांगमुखच.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी सेवा निवृत्तीनंतर आपले जीवन व्यतीत केले आहे. पर्यावरण म्हणजेच आपले जीवन समजून त्यासाठी निष्ठेने आयुष्यभर काम केले आहे. हे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुकाराम गभाले गुरुजी भविष्यात दीपस्तंभ बनले तर नवल वाटणार नाही. वनपुरुष म्हणून ख्याती असलेले तुकाराम बाबा आपल्या परिसरातील गावांमध्ये हिरवाई निर्माण व्हावी, पारंपारिक जंगलांचे जतन व्हावे व त्यात वृद्धी व्हावी, यासाठी सेवानिवृत्तीनंतरचे आपले जीवन व्यतीत करीत आहे.
शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. चार भिंतीची त्यांची शाळा बंद झाली. परंतु निसर्गाची शाळा त्यांनी कधीही बंद होऊ दिलेली नाही. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने व सहभागाने त्यांनी वृक्षसंवर्धनासाठी केले कार्य आदिवासी पाड्या वस्त्यांवर सर्वश्रुत आहे. मान्हेरे, कोदणी, रंधा, लाडगाव, टिटवी, डोंगरवाडी, पिंपरकणे, आंबेवंगण अशा विविध गावांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. ती संख्या 25 लाखांच्या कमी नाही.
यामध्ये प्रामुख्याने साग, बांबू, अकेशिया, काशीद, शिवण, आंबा, काजू, जांभूळ, सुबाभूळ यांचा समावेश आहे. तुकाराम बाबांनी स्वतःचे माळरान ज्या पद्धतीने वृक्षवेलींनी सजवले आहे, ते बघता स्थानिक शेतकऱ्यांसाठी तो एक आगळा वेगळा पथदर्शी आदर्श निर्माण होत आहे. आंबा, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, रामफळ, ब्राझिलियन चेरी, केळी, हिरडा, बेहडा, जांभूळ, साग, बांबू, ऐन, चंदन, अर्जुन सादडा, खैर, सीसम, काटे सावर, बहावा, शिंदी, बेल, अशा कितीतरी प्रकारच्या वनस्पतींचे त्यांनी स्वतःच्या शेतावर संवर्धन केले आहे.
यासोबतच अनेक औषधी वनस्पती त्यांच्या शेतावर संवर्धित केलेल्या आहेत.
यामध्ये गावठी शतावरी, आडुळसा, निर्गुडी, गावठी हळद, रान केळी, चितृक, चिचूर्डा, नागफणी यासह अनेक वनस्पतींचा यात समावेश आहे. याशिवाय त्यांनी दालचिनी, मिरे यासारखे मसाल्याच्या लागवडीचा प्रयोग आपल्या शेतावर यशस्वी करून दाखवला आहे. शेतावर लावलेल्या फळझाडांच्या माध्यमाने त्यांना जीवन चरितार्थ चालवणे सुखकर झाले आहे. गुरुजींनी उभे केलेले वन आणि फळ शेतीचे मॉडेल आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी उत्तम उदाहरण म्हणता येईल. तुकाराम बाबांनी सुरू केलेले हे मिशन तरुणांनी नक्की पुढे नेले पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे.