सांगली – सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. थोडीशी चूक कुणाच्या जीवावर बेतल याचा भरवसा नाही. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे घडली आहे. दोन चिमुकले बसलेले ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने त्यापैकी एका तीन वर्षांच्या मुलाचा करुण अंत झाला.
अचानक क्लचवर पाय पडल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. त्यासोबत पाण्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ तालुक्यात घडली आहे. या दुर्घटनेत चार वर्षांच्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. शनिवारी ते शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. गुरुनाथ व तेजस ही दोन्ही मुले सोबत शेतात आली होती. कामे उरकून घरी जाण्यासाठी माळी दोन्ही मुलांना घेऊन ट्रॅक्टरमध्ये बसले. यावेळी शेतीकामासाठी आणलेले साहित्य विसरल्याचे लक्षात आले. श्रीरंग माळी ट्रॅक्टरमधून उतरून विसरलेलं साहित्य आणण्यासाठी गेले. त्याच वेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन मुलांपैकी एकाचा पाय चूकून ट्रॅक्टरच्या क्लचवर पडला. यामुळे अगोदरच उतारावर उभा असलेला ट्रॅक्टर जोरदार वेगाने विहिरीच्या दिशेने गेला आणि विहिरीत कोसळला.
दरम्यान ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन्हीपैकी एक मुलगा गुरुनाथ ट्रॅक्टरमधून खाली पडला. मात्र तेजस ट्रॅक्टरसोबत विहिरीत पडल्याने पाण्यात पडला. तेजसला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उशीर झाला होता.