पुणे – पुणे महानगर प्राधिकरण विकास क्षेत्र यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग क्रमांक-3 चे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प होत आहे. “पीएमआरडीए’ आणि टाटा-सिमेन्स यांच्यात सवलत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास “पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केले.
सवलत करार झाल्यानंतर पत्रकार परिषदेत कुमार बोलत होते. यावेळी टाटा रियल्टी ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे विनायक देशपांडे, सिमेन्स व्हेन्चर्स जीएमबीएचचे आलोक कुमार, पीएमआरडीच्या अपर मुख्यकार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी व मुख्य अभियंता विवेक खरवडकर उपस्थित होते.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाला केंद्र सरकारच्या 2017 च्या नवीन मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मान्यता दिली आहे. हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे, जो या पद्धतीने होत आहे. मेट्रो प्रकल्पाची मार्गिका संपूर्णतः उन्नत असून, हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कपासून सुरू होऊन ती बालेवाडीमार्गे शिवाजीनगरला पोहोचणार आहे.