नगर – राज्यात उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एप्रिल महिन्यातच मे महिन्यातील भीषण उन्हाळ्याचा अनुभव लोकांना येत आहे. दिवसाच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. या दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. तसा हा अनुभव नेहमीचाच आहे. यंदा मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यानंतरही राज्यात पाण्याची फारशी टंचाई जाणवलेली नाही. तरी देखील ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, तेथे टॅंकर सुरू केले आहेत. राज्यात सध्या 60 गावे आणि 93 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना 34 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नगर जिल्ह्यात मात्र अजून एकही टॅंकर सुरू नाही.
राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. या दिवसात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. ग्रामीण भागाला या संकटाचा जास्त फटका बसतो. उन्हाळ्यात येथे पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर जिल्हा प्रशासनामार्फत टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदा तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तरी देखील पाण्याची टंचाई फारशी जाणवलेली नाही. मागील वर्षात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरणे, जलाशयांत पाणी मुबलक आहे. तरी देखील राज्यात काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. तेथे प्रशासनामार्फत टॅंकर सुरू केले आहेत.
राज्यात सध्या रत्नागिरी 3, रायगड 12, पालघर 14, अमरावती 2 आणि बुलढाणा जिल्ह्यात 3 असे एकूण 34 टॅंकरद्वारे 60 गावे आणि 93 वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात अजून एकही टॅंकर सुरू नाही.