पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि.31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीस सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेषत: बारावी फेरपरीक्षेतील उत्तीर्णांना प्रवेशाची संधी आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या रिक्त जागा आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.
सीईटी सेल प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष महाजन यांनी याबाबतचे परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध केले आहे.
अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदत दि.14 ऑगस्टपर्यंत होती. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया होणार नसल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले. मात्र, अजूनही काही विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रथम वर्ष प्रवेशासाठी जागाही तितक्याच रिक्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, आता संस्थांना दि.31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. बारावी फेरपरीक्षेचा तीन दिवसांपूर्वी निकाल बोर्डाने जाहीर केला. त्यात राज्यातून 30 हजार 438 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेतून उत्तीर्ण होऊन कुठेही प्रवेशाची शक्यता नव्हती. या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.
अभियांत्रिकी प्रवेशाला घरघर 62 हजार जागा शिल्लक
गेल्या पाच वर्षांपासून अभियांत्रिकी पदवीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत आहे. गतवर्षी फक्त 43 टक्के प्रवेश झाले होते. यंदा अजून 49 टक्के प्रवेश राहिले आहेत. अभियांत्रिकी प्रवेशाची क्षमता 1 लाख 27 हजार इतकी आहे. त्यापैकी सध्या 62 हजार जागा रिक्त असल्याची आकडेवारी तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावरून यंदाही अभियांत्रिकीचे प्रवेश निम्मेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पण, आता काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालये प्रवेशाअभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासकीय अभियांत्रिकी वगळता खासगी संस्थेत प्रवेशाची संख्या फारच घटली आहे. सद्यस्थितीत मेकॅनिकल-72, सिव्हिल-68, इलेक्ट्रिकल्स-69 आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 33 टक्के जागा रिक्त असल्याचे तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.