पुणे – दसऱ्याच्या अगोदर केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर उत्सवाच्या काळात ग्राहकोपयोगी वस्तूची विक्री वाढून मंदी कमी होण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र, आता सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण, महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला तर सर्वांच्या अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदत मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या बाजारात निर्माण झालेली मंदी कमी होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जाते. सातव्या वेतन आयोगानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जातो. सध्या सरकार आकडेमोड करत करीत असून यात 5 टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार महागाई भत्त्याचा आढावा प्रत्येक 6 महिन्याला घेत असते. या संदर्भातील निर्णय तत्त्वतः जानेवारीत घेण्यात आला होता आणि जुलैपासून अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, जुलैऐवजी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
बाजारात खेळता पैसा वाढणार
मागणी नसल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री सध्या कमी आहे. बाजारातील मंदी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात बरेच प्रयत्न केले आहेत. रिझर्व बॅंकेने रेपो दरात मोठी घट केली आहे. आता जर महागाई भत्त्यात वाढ केली तर सणासुदीच्या काळात बाजारात खेळता पैसा वाढण्याची शक्यता आहे.