मुंबई – ट्रक, टॅंकर चालकांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला असून, काही ठिकाणी या संपाला हिंसक वळणसुद्धा लागल्याचे दिसून आले. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संपामुळे कुठेही तणाव निर्माण होता कामा नये, असे निर्देश दिले आहेत.
हा कायदा चुकीचा असून तो परत घ्यावा, अशी मागणी करत मुंबई, इंदूरपासून दिल्ली, हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यावर उभे करत वाहतूक रोखली आहे.
ट्रक, टॅंकर चालकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, तेल कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये एलपीजीची वाहतूक करणारे वाहनचालक व वाहतुकदार यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे कुठल्याही प्रकाराची बाधा येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा – छगन भुजबळ
राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एल.पी.जी., पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.