पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान असलेल्या ८ राज्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही ३ लोकसभा मतदारसंघ ५० टक्क्यांहून कमी मतदानाचे, १३ मतदारसंघ ५० ते ६० टक्के, २२ मतदारसंघ ६० ते ६५ टक्के मतदान, तर ६५ टक्क्यांवर मतदान असलेले १० मतदारसंघ आहेत. मुंबई, पुणे, ठाणे शहरात राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी मतदान होते.
शहरी नागरिकांच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास केला असता, त्यांच्यात मतदानासाठी प्रवास करण्याची मानसिकता नसणे, मतदानाच्या दिवसाला सुट्टीचा दिवस मानणे, सुशिक्षित नागरिकांच्या मतदानाप्रती उदासीनतेमुळे शहरात कमी मतदान होत असल्याचे विश्लेषणात समोर आले आहे.
यशदा येथे आयोजित स्वीप नोडल अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ही माहिती सादर करण्यात आली. या वेळी प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले, निवडणूक आयोगाच्या भूमिका सुरुवातीच्या काळातील नियंत्रक, अंमलबजावणी करणारी संस्था ते आता मतदान जनजागृतीपर्यंत विस्तारल्या आहेत. निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे, तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे.
आता सर्वांना मिळून कमी मतदान होणाऱ्या केंद्रापर्यंत पोहोचून तेथे ९० टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदार संघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत.
निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक अजमेरा म्हणाले, सुरुवातीला केवळ मतदान जागृतीचे उपक्रम साजरे करण्यापर्यंत मर्यादित असलेला स्वीप उपक्रम मतदानविषयक माहितीचे विश्लेषणानुसार करावयाच्या उपाययोजनांपर्यंत पोहोचला आहे. आता मतदानाची टक्केवारी, मतदारांचा सहभाग कमी पडू नये, याला महत्त्व आले आहे. यासाठी त्यातील कमतरता शोधून त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. पुणे जिल्ह्याने स्वीप उपक्रमात खूप चांगले काम केले आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्रे
संविधान निर्मितीनंतर मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. युरोपातील काही देशांच्या आधीच संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध प्रयत्न होत असून, राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.