पिंपरी, (प्रतिनिधी) – पुण्यातील बहुतेक सर्व लोकसभा जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी शिवसेनेच्या बैठकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा आहेत. परंतु अद्याप याबाबत अधिकृत रित्या स्पष्टता करण्यात आलेली नाही. 28 मार्च रोजी जागावाटपाबाबत महायुतीकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे 28 मार्चपर्यंत सस्पेंस कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरुन अजूनही खलबते सुरू आहेत. जागा वाटपाबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेतून संजोग वाघेरे निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. महायुतीत मात्र अजूनही मावळ मतदारसंघाबाबत सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे.
मावळची जागा कुणाकडे जाणार याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. मावळसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही आहे तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने ही निवडणूक भाजपला सोपी वाटत आहे. यामुळे भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढतच चालली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेेते देखील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसून येत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिली शाश्वती?
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत निर्माण होत असलेल्या तिढ्याबाबत चर्चा केली. मित्रपक्षाकडून होत असलेल्या विरोधावर देखील चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतु या बैठकीत कुणालाही नाराज करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनीच शाश्वती दिली असल्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे समर्थक सांगत आहेत.
धनुष्यबाण की कमळ?
महायुतीचा उमेदवार यंदाची मावळ लोकसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत देखील चर्चा सुरू आहेत. ज्या पद्धतीने शिरुर मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जात आहे. तसेच काही मावळमध्ये होण्याची शक्यता देखील काहीजण वर्तवित आहेत. खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? आणि मिळाल्यास ते कमळाच्या चिन्हावर लढणार की धनुष्यबाणावर याबाबतही चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार मशाल चिन्ह घेऊन लढत असल्याने धनुष्यबाण आणि मशाल यांच्यात लढत घडविण्याऐवजी कमळाला प्राधान्य देण्याचे तर्क मांडले जात आहेत. दुसरीकडे मावळमधील चिंचवड आणि पनवेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य विजय सोपा करु शकते आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. ही सर्व समीकरणे पाहता धनुष्यबाण की कमळ ? याबाबत चर्चेने जोर धरला आहे.
भाजप रिस्क घेणार का?
गेल्या दोन निवडणुकांमध्ये खासदार बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. गत दोन निवडणुकांमधील प्रतिस्पर्धी उमेदवार पाहता बारणे यांनी मिळविलेला विजय मोठा मानला जातो. यंदा भाजपने 400 पारचे लक्ष्य निश्चित केले असल्याने एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यातच भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. परंतु मतांचे गणित पाहता भाजप रिस्क घेणार का? याबाबत देखील चर्चा सुरू आहे.
काय सांगतात आकडे
मागील दोन निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यास विद्यमान खासदारांच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. 2009 साली पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत केवळ 44.71 टक्के मतदान झाले होते. सुमारे 7 लाख 17 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक 3 लाख 64 हजार मते मिळवित शिवसेना-भाजप युतीचे गजानन बाबर निवडून आले होते.
2014 साली मतदानाचा टक्का वाढला 11 लाख 74 हजार मतदारांनी मतदान केले. यावेळी काहीशी तिरंगी लढत पहावयास मिळाली होती. त्यापैकी 43 टक्के म्हणजे 5 लाख 12 हजार मते मिळवत श्रीरंग बारणे विजयी झाले होते. अपक्ष उमेदवार स्व. लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकरांना 1 लाख 82 हजार मते मिळाल्याने बारणे यांचा विजय सोपा झाला.
2019 साली बारणे यांची थेट लढत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत होती. एकूण 13 लाख 69 हजार मतदारांनी केलेल्या मतदानात बारणे यांनी 52 टक्के म्हणजेच 7 लाख 20 हजार मते मिळवत दोन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला.