नवी दिल्ली – मोदी सरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकावर देशविरोधी आणि माओवादी असल्याचा शिक्का मारला जात आहे, असे टीकास्त्र शनिवारी कॉंग्रेसकडून सोडण्यात आले. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अशी आग्रही भूमिकाही त्या पक्षाकडून मांडण्यात आली.
आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नसून त्यामध्ये इतर घटकांनी घुसखोरी केली असल्याचा आरोप काही केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आला. त्याचा समाचार कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी घेतला. विरोध करणाऱ्या प्रत्येकाला माओवादी आणि देशविरोधी ठरवण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अवलंबत आहेत.
लोकशाहीत अनियंत्रित कारभाराला कुठले स्थान नाही. भीषण थंडीत आणि पावसात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारने माफी मागावी, असे ट्विट त्यांनी केले. कृषी सुधारणा शेतकरी हिताच्या असल्याच्या मोदी यांच्या वक्तव्यावरही सुर्जेवाला यांनी प्रतिक्रिया दिली.
लॉलीपॉप दाखवण्याच्या मोदींच्या कृतीला संपूर्ण देश विटला आहे. शेतकऱ्यांना आलंकारिक भाषणांची नव्हे; तर जनहिताच्या प्रशासनाची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.