मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्याने आणि पुढील सुनावणी 25 जानेवारी 2021 रोजी ठेवल्याने हजारो मराठा उमेदवारांवर नोकरी गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिकेते पुन्हा जात असून येत्या 14 व 15 डिसेंबरला नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले ईएसबीसी व एसईबीसी मराठा उमेदवार मुंबईच्या आझाद मैदानावर दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वाहन मोर्चास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे आंदोलकांची भावना आहे की, यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे उमेदवार उपोषण करणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या झूम मिटिंगमध्ये समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने झालेल्या बैठकीत उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न, “सारथी’ संस्था गतिमान करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डी खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे यासह इतर मागण्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे तोपर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुढील आंदोलनाच्या जनजागृतीसाठी व न्यायालयीन लढ्यात देखील सर्वांनी सहभागी होऊन व आपापल्या परीने योगदान द्यावे असेही ठरवण्यात आले आहे. विधानसभा अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधण्यात येणार असल्याचेही आंदोलकांनी ठरवले आहे.