नवी दिल्ली – बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या, सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. एकीकडे सत्ताधारी बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले असताना दुसरीकडे विरोधक फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून ‘गेम’ खेळला जात असल्याचा दावा केला जात आहे.
नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारत राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपशी मैत्री करून बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन केले. आता ते नवे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. जेडीयूने विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी रविवारी सायंकाळी पाच वाजता आमदारांची बैठक घेतली.
ही बैठक मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत पार पडली. तत्पर्वी, मंत्री श्रवण कुमार यांनी घेतलेल्या बैठकीस जेडीयूच्या ५४ आमदारांपैकी ३९ आमदार हजर होते. या बैठकीस ६ आमदार गैरहजर होते. मात्र, ते काही वैयक्ितक कारणामुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सरकारच्या त्या शक्तिपरीक्षेवेळी काही आमदार सत्ताधारी गोटाच्या बाजूने मतदान करू शकतात, अशी धास्ती विरोधकांना वाटत आहे. त्यातून खबरदारीचा उपाय म्हणून राजदच्या आमदारांना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्या बंगल्यात मुक्कामासाठी पाचारण करण्यात आल्याचे समजते. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. नव्या समीकरणांमुळे पुन्हा विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेला राजद संख्याबळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा पक्ष आहे. राजदचे ७९ आमदार आहेत.