मुंबई : स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. 29) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.
स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक,सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या 500 दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले.
स्पेनमध्ये मोठा भारतीय समुदाय असून भारतातून स्पेनमध्ये अधिक पर्यटक यावे तसेच स्पेनमधून देखील भारतात अधिक पर्यटक यावे यासाठी आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.
महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून स्पॅनिश पर्यटकांना महाराष्ट्रात येऊन खचितच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्या दृष्टीने मुंबई – माद्रिद थेट विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया उपस्थित होते.