पुणे – महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप सुरुच आहे. याआधी मलिक यांनी फडणवीसांवर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर देत मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता मलिकांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला असून त्यांच भाजपमधील महत्त्व कमी झाल्याचं म्हटलं.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. मलिक यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली. फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर मलिकांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “चीडिया चूग गयी खेत, अब पछताए का होये”. फडणवीस यांना सत्तेशिवाय राहताच येत नसून त्यांनी 2 वर्षांपूर्वीच हे सिद्ध केलं. अद्यापही ते हेच म्हणतात की मला वाटत नाही की, मी मुख्यमंत्री नाही. पण, फडणवीस यांना 2 वर्षांनंतर खरी परिस्थिती स्वीकारल्याचं दिसून येतंय.
दरम्यान फडणवीस यांचं भाजपमधील महत्त्व कमी होत चाललं आहे. भाजपमध्ये जे त्यांचे अंतर्गत विरोधक होते, त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. यामध्ये विनोद तावडेंचा समावेश होता. तावडे आता मोठे होतायत. भाजपमधील अंतर्गत राजकारण बदलत असून फडणवीस यांचं महत्त्व कमी होत असल्याचं मलिक यांनी म्हटलं.
ज्या तावडेंना तिकीट नाकारण्यात आलं, ते आज भाजपचे देशाचे सरचिटणीस बनले. आता, 2-3 महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शिवाय तावडेंना आता पंतप्रधानांकडे थेट एक्सेस मिळाल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधलं.