नवी दिल्ली – बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय डाव लढवला जातो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे बंधु पशुपती पारस यांना त्यातून बाहेर केल्याची चर्चा आहे. पशुपती पारस आणि त्यांचे पुतणे अर्थात रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्यातील संघर्षात भाजपने चिराग यांच्यावर आपला डाव लावला आहे.
सूत्रांच्या मते पारस यांची केवळ एकाच जागेवर बोळवण केली जाण्याची शक्यता आहे. त्यांना त्यापेक्षा अधिकचे काही मिळणार नाही. याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी तसे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पारस यांना नाराज करण्याचीही भाजपची इच्छा नाही. त्यामुळे त्यांना राज्यपाल केले जाण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. तो प्रस्ताव पशुपती पारस स्विकारतात का यावर बिहारमधील बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
भाजपने चिराग यांच्यासाठी लोकसभेच्या पाच जागा सोडल्या आहेत. त्यातूनच त्यांनी आपली भूमिका बऱ्याच अंशी स्पष्ट केली आहे की भविष्यात त्यांच्या दृष्टीने चिराग हेच महत्वाचे असणार. गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नुकसान करण्यात चिराग यांच्या पक्षाचीच महत्वाची भूमिका राहीली होती.
पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नितीश यांच्या पक्षाची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती ती चिराग यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे एकप्रकारे त्यांनी बाहेर जाऊन भाजपच्या मदतीचेच काम केले होते. रामविलास पासवान यांची हाजीपूरची जागा चिराग यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचा हा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चिराग यांची उंची वाढली असल्याचे दर्शवणारा आहे.